खर तर छ्त्रपती शिवाजी महाराजांबद्दल कितीही लिहले तरी ते थोडकेच.!शिवकार्याची लांबी व रुंदी कोणीही मोजू शकत नाही. शिवचरित्र म्हणजे अमृतच..! ते कोणत्याही भांड्यातून प्याले तरी त्या अमृताची गोडी बदलत नाही. आज whatsapp च्या काळात नको तेवढे समूह आणि नको ते संदेश वाचता - पाहता वीट येऊन जातो. अशावेळी बहुतेक लोक संसाधनांना नावे ठेवतात. पण वापरकर्ते काही सुधारत नाहीत. या संसाधनांचा योग्य वापर करून शिवआचार व विचारांचा प्रचार व प्रसार केल्यास प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील असे वाटते. सध्याचा काळ हा घ बिघडवण्याचा जास्त वाटतोय. ज्यांना समाज घडवायचा तेच हातातील साधनाने आग लावत सुटले आहेत. अशा काळात सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा धागा म्हणजे शिवचरित्र..! अबालवृध्दाना आवडेल अशा सहज सोप्या शैलीतले हे शिवचरित्र वाचनीय पेक्षा अनुकरणीय आहे. बदलत्या काळात शिवचरित्र डोक्यात घेण्याची गरज आहे. आचरणकर्ते शिवभक्त वाचनातून निर्माण होतील असा मोडी व्यक्त करतो. शिवइतिहासाची सद्यस्थितिशी सांगड घालून आज आपले राष्ट्र बलवान करण्यासाठी कोणकोणत्या उपक्रम व कृतींची आवश्यकता आहे हे हक्काने आणि हट्टाने प्रस्तुत कादंबरीतून प्रतिपादन केले आहे. कारण आवाहन व आव्हान केल्याशिवाय आम्ही जागे होत नाहीत ही आमची शोकांतिका आहे. शिवआचार - विचारांच्या या जागरकार्य चळवळीत मला खारीचा वाटा उचलता आला हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. राष्ट्र प्रथम, वंदे मातरम् जय शिवराय.